असे गैरसमज तुम्हालाही झाले आहेत का?

अनुभवांमधून आपण खूप काही शिकत असतो आणि ते शिकता शिकता आपले खूप समज गैरसमज दूर होत असतात. काही गैरसमज अनुभव आल्याशिवाय दूर होत नाहीत. आपण खूप वेळा, लोकांच्या तोंडून खूप गोष्टी ऐकतो आणि त्याकडे दुर्लक्ष देखिल करतो मात्र जेव्हा आपल्याला ते अनुभव येतात त्यावेळी ते सगळे आठवते आणि काही गोष्टी खऱ्या तर काही खोट्या आहेत याची जाणीव होते.

आपण घेत असलेले काही अनुभव आपल्याला घडवत असतात, आपल्याला आलेल्या काही अनुभवांमुळे आपले आयुष्य कायमचे बदलून जाते, आपली आयुष्याकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे वेगळी होऊन जाते. पण जे काही होते ते चांगल्यासाठीच होत असते. काही गैरसमज कदाचित तुम्हाला देखिल झाले असतील.

आपल्याला असे वाटत असते की, आयुष्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीला किंव्हा एखाद्या परिस्थितीला थोडा वेळ दिला तर सगळे ठीक होईल. मात्र तसे होत नाही ती व्यक्ती आपल्याला आणखी गृहीत धरू लागते किंव्हा त्या परिस्थिती मधुन आपल्याला बाहेरच पडता येत नाही. जर तुम्हाला असे वाटले की, आणखी वेळ देण्याची गरज आहे तर त्या व्यक्ती मधुन किंव्हा त्या परिस्थिती मधुन त्याच क्षणी बाहेर पडा.

आपल्याला असे वाटत असते की, थोडे दिवस जाऊ द्यावे आपण एका विशिष्ठ टप्प्यावर पोहचलो की मग गुंतवणूक करायला सुरुवात करता येईल. पण तसे कधीच होत नाही तो आयुष्याचा टप्पा कधीच येणार नाही त्यामुळे जिथे आहात तिथून च छोटी मोठी का होईना गुंतवणूक करायला सुरुवात करा.

आपले शिक्षण पूर्ण झाले की मग आपल्या आयुष्याची गाडी रुळावर येईल, त्यानंतर जीवनात काही ताणच नाही उरणार. पण परिस्थिती पूर्णपणे उलट असते जेव्हा आपले शिक्षण पूर्ण होते तेव्हा सगळ्याच गोष्टींची खरी सुरुवात होत असते. तेव्हा खरा ताण सुरू होतो, तेव्हा आपले गैरसमज दूर व्हायला सुरुवात होते.

गैरसमज दूर झाल्यावर आपल्या समोर जे चित्र उभे राहते ते खूप स्पष्ट असते, निर्णय घेण्याची जी आपली क्षमता असते ती जास्त भक्कम होते. योग्य निर्णय घ्यायला मदत होते, त्यामुळे हे समज गैरसमज आणि त्यामधून मिळणारे अनुभव दोन्ही महत्वाचे आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट